अकोला बाजार आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची धावती भेट
यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार हे गाव केवळ व्यापारी दृष्टिकोनातून नव्हे, तर आरोग्यदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे तब्बल ३९ गावांसाठी एकमेव आधार आहे. मात्र, या ‘जीवनदाता’ ठरणाऱ्या केंद्राची अवस्था इतकी भयावह झाली आहे की, स्वतः रुग्णांपेक्षा हे केंद्रच ‘आयसीयू’मध्ये टाकण्याची गरज निर्माण झाली आहे!
हल्ली पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाच्या आगमनानंतर या आरोग्य उपकेंद्रात जणू इमारतीला जागोजागी स्लॅबला छिद्रे पडलीय काय असा प्रश्न निर्माण होऊन स्लॅबच्या छतावरून होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे डॉक्टरांना रुग्णांची तपासणी केबिनबाहेर बसून करावी लागत आहे. अधिक महत्त्वाची धक्कादायक बाब म्हणजे, येथे असलेल्या ऑपरेशन रूममध्ये लाखो रुपयांची महागडी उपकरणे धूळ खात पडून आहेत आणि त्याच खोलीत छतातुन पाणी गळत असल्यामुळे त्या यंत्रसामग्रीला कायमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
इतकंच नाही तर, जिथे रुग्णांना औषधे आणि गोळ्या वितरित केल्या जातात, त्या कक्षात स्लॅब मधुन पाण्याची होणार्या गळतीने औषधांच्या बॉक्सवर बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी औषधांचा साठा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तसेच छत वर लावलेल्या सिलिंग पंख्यातून पाणी गळतांना दिसते आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत, तसेच या जुन्या इमारतीत अंडरग्राउंड फिटींग केल्या विद्युत चा कधी काळी करंट लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशी ही गंभीर स्थिती येथे निर्माण झाली आहे.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान देखील अक्षरशः पडके झाले आहेत. छताची गळती,भिंतीवरील भेगा आणि साचलेल्या पाण्यामुळे तिथे राहणे ही एक शिक्षा झाली आहे. अशा बिकट परिस्थितीतही डॉ. माधव जाधव आणि त्यांचे सहकारी सेवा देत आहेत. डॉ. जाधव यांना विचारले असता, आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून या समस्यांकडे लक्ष वेधले आहे, पण अद्याप ठोस उपाय झालेले नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
अश्यात सोमवार ७ जुलै रोजी कामा निमित्त या आरोग्य उपकेंद्रात सामाजिक कार्यकर्ते,शिवसेना उपतालुका प्रमुख राजू मादेश्वर गेले असता त्यांनी ही परिस्थिती पाहिली. ही परिस्थिती पाहताच मादेश्वर यांनी दूरध्वनी वरुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्याशी थेट संपर्क साधला.
डॉ सुभाष ढोले यांनी तातडीने आरोग्य केंद्रालाभेट दिली आणि प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी “लवकरच नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करून बांधकाम विभागाकडे सादर केला जाईल,” असे आश्वासन दिले. या भेटी दरम्यान पत्रकार हमीद पठाण, सचिन कोयरे, प्रविण राठोड, कर्मचारी यांनी केंद्राच्याअवस्थेविषयी आपली भूमिका मांडली.
या भेटीनंतर नागरिकांत आणि कर्मचाऱ्यांत काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. मात्र, प्रश्न असा आहे की केवळ या भेटीने आरोग्य उपकेंद्राला नवसंजीवनी मिळेल का? की यावेळीही ‘पत्रव्यवहार’ आणि ‘प्रस्तावाच्या फाईली’ पुन्हा धूळ खात पडतील?
त्यामुळे जितक्या लवकर ही इमारत नव्याने उभी राहील, तितक्या आत्मीयतेने कर्मचारीही आपले कर्तव्य पार पाडतील. अन्यथा, या ‘आजारी’ आरोग्य केंद्राची स्थिती बघून नागरिक हताश होईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
