साखरखेर्डा : (असलम अंजुम) येथील तांबोळीपुऱ्यातील रहिवाशी शेख युनूस शेख गफूर तांबोळी यांना त्यांच्या पवित्र हजयात्रेसाठी काल दि. १८ मे रोजी गावाकऱ्यांच्या वतीने सश्रद्ध वातावरणात निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमास सर्वधार्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इस्लाम धर्मातील कलमा, रोजा, नमाज, हज, जकात या पाच स्तंभांपैकी “हज” हा एक मुख्य कर्तव्य मानल्या जातो. आयुष्यात एकदा तरी हजयात्रेसाठी सउदी अरबच्या मक्का – मदीना या शहराला जाण्यासाठी प्रत्येक मुस्लिम धर्मीय हा आवर्जून प्रयत्न करीत असतो. हजयात्रा करुन आल्यानंतर मृत्यूपश्चात आल्लाहकडून स्वर्गप्राप्तीची निःस्सीम श्रद्धा जोपासून तसे जीवन जगण्याची कामना सर्वच मुस्लिम धर्मीय अबाल – वृद्ध, तरुण स्त्री – पुरुष करीत असतात. प्रत्येक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी ही तीर्थयात्रा करणे अनिवार्य मानले जाते. शेख युनूस तांबोळी यांनी अगदी बेताच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांचा एक मुलगा शेख अफसर याने मुंबईत जावून फिल्म इंडस्ट्रीच्या इव्हेन्ट मॅनेजमेंटमध्ये जम बसविले आणि येथूनच तांबोळी परिवाराची आर्थिक परिस्थिती सुदृढ होत गेली. आपल्या आई – वडील आणि भावंडांसाठी शेख अफसरने महत्वाचे असे योगदान दिले. शेवटी आई – वडिलांना पवित्र हजयात्रेसाठी मक्का – मदीना या शहराला पाठविण्याचा त्याचा मानस होता. परंतु आईच्या प्रकृती अस्वस्थामुळे कुटुंबीयांकडून काल वडिलांनाच हजयात्रेसाठी मुंबईला रवाना करण्यात आले. घरापासून ते बसस्थानकापर्यंत पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढण्यात आली. विशेष महत्वाचे म्हणजे यावेळी गावांतील सर्वधार्मीय राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर अशी मंडळी आवर्जून उपस्थित होती. शेवटी सश्रद्ध वातावरणात शेख युनूस भाई यांना त्यांच्या पवित्र हजयात्रेसाठी जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.