वृक्ष लावून वनराईचे जतन करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य
– गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत तेंडोळी येथे वृक्षारोपण
वृक्ष आणि वनराई ही सजीवांचे श्वसन स्त्रोत असून येणाऱ्या पिढीसाठी वृक्ष लावून वनराईचे जतन करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आर्णी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्रीताई वाघमारे यांनी केले. त्या आजादी का अमृत महोत्सवानिमित्य राजस्व अभियानांतर्गत आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत तेंडोळी येथे आयोजित वृक्षारोपण व पर्यावरण शपथ कार्यक्रमात बोलत होत्या.
त्या पुढे अशाही म्हणाल्या की, निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ. सपना रविशंकर राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी जयश्रीताई वाघमारे, सहाय्यक गट विकास अधिकारी मनवर, विस्तार अधिकारी मुरलीधर भगत, गजानन चोपडे, उपसरपंच भगवान निकुरे, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक पी.बि.चक्रनारायण, ग्रामपंचायत सदस्य परशराम राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तेंडोळी च्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार ठेंगेकर यांनी तर आभार प्रदर्शन पी.बि.चक्रनारायण यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रल्हाद क. राठोड, संतोष ध.आडे, सौ. विद्या ना.कोलते, सौ.सुनिता म.चव्हाण, सौ.कमलाबाई कि. पवार, सौ.सिमा जितेश चव्हाण, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी महादेव शेलोटे, जितेश चव्हाण, शिवाजी कोलते, सुशील निकुरे, रविशंकर राठोड यांनी परिश्रम घेतले.
