दीनदयाल प्रतिष्ठान ही अनुकरणीय संस्था
हंसराज अहिर
पं. दीनदयाल उपाध्याय यांचं स्वप्न होत की, या समाजातील अंतिम व्यक्ती पर्यंत विकास पोहचावा. समाज शोषण मुक्त व्हावा. त्यादृष्टीने केंद्र शासन काम करीत आहे. प्रत्येक प्रश्न शासनावर न सोडता याच भावनेतून दीनदयाल सेवा प्रतिष्ठान विधवा, परितक्त्या, शोषित महिलांच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी करण्यात येणारे प्रत्येक काम हे अनुकरणीय आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे.
दीनदयाल सेवा प्रतिष्ठान व सेवा चॅरिटेबल फाऊंडेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊबीजेचा कार्यक्रम जैताई मंदिरात घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे सचिव विजय कद्रे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, तालुका संघचालक हरिहर भागवत, नगर संघचालक किरण बुजोणे, प्रतिष्ठित व्यापारी अशोक भंडारी, आचल जोबनपुत्रा, संघाचे जिल्हा सहकार्यवाह प्रशांत भालेराव, दीपक नवले, अर्बन बँकेचे संचालक तथा सेवा चॅरिटेबलचे अध्यक्ष प्रशांत माधमशेट्टीवार, किरण देरकर, मिराताई घाटे, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत माधमशेट्टीवार यांनी केले. यात त्यांनी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना बोदकुरवार म्हणाले की, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणं लागत या भावनेतून काम करणाऱ्या दीनदयाल संस्था वंचित घटकांना स्व बळावर उभे करण्याचे काम सातत्याने करीत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपण समाजासाठी काय दिल याचा विचार प्रत्येकाने करावा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर प्रशांत भालेराव म्हणाले की, समाजात अंधकारमय जीवन जगणाऱ्या शोषित, विधवांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे काम दीनदयाल संस्थेने केले. अशोक भंडारी यांनी कामाची आवश्यकता असणाऱ्या महिलांना त्यांच्या उद्योगात काम देण्याचे आश्वासन दिले. निर्मला कोयचाडे यांनी दीनदयाल संस्था त्यांच्या सारख्या महिलांच्या पाठीशी कशा प्रकारे खंबीरपणे उभी राहते याची स्वानुभावनेतून माहिती दिली.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना विजय कद्रे म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात 2006 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या झाल्या. त्यातील विधवांसाठी भाऊबीजेचा कार्यक्रम दीनदयालने सुरू केला. या 15 वर्षात 450 महिलांपैकी 300 महिलांना या संस्थेमार्फत आत्मनिर्भर करण्यात यश आले आहे. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भात जिल्ह्यातील पाचशे घरांचे सर्वेक्षण केले. त्यातून निघालेल्या निष्कर्षाच्या आधारे काम करणे सुरू केले आहे. त्या अंतर्गत चार हजार शेतकऱ्यांचे सेंद्रिय शेती करण्यास मदत करून 15 हजार एकर शेतीवर सेंद्रिय शेती सुरू आहे. जिल्ह्यातील 2800 महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन आत्मनिर्भर बनवले आहे.
त्यानंतर शेतकऱ्यांचा विधवा महिलांनी उपस्थितांना भाऊबीजेची ओवाळणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गौरकार यांनी केले. आभार प्रदर्शन रवी ढुमणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी धुळे, सुरेंद्र नार्लावार, नितीन वासेकर, मधुकर जगताप यांनी परिश्रम घेतले.
