आज समाजात चोखंदळ वाचकांची गरज आहे. मनाला स्वच्छ करण्याचे काम साहित्य करतो ==प्रा वसंत पुरके
समाजात दिवसेंदिवस वाचकांची संख्या घटत असून साहित्य वाचण्याकरिता समाजात चोखंदळ वाचकांची गरज निर्माण झाली आहे. समाजाचे मन स्वच्छ करायचे असेल तर ते साहित्य करू शकते असे मत राज्याचे माजी मंत्री प्रा वसंत पुरके यांनी राळेगाव समाचार च्या एकोणतिसाव्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केले ते प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष होते समाजातील जाणकार व्यक्तिमत्व स्वर्गीय सलीम “सागर” यांनी लावलेले राळेगाव समाचार चे रोपटे आता भरू लागले आहे आज वृत्तपत्र चालवणे हे एक मिशन झाले आहे लोकशाहीच्या या चौथ्या आधारस्तंभाला बळ देण्याकरिता समाजाने पुढे यावे. साहित्यामुळेच मला बळ मिळालं, साहित्याने मला मिरवलं, अख्ख्या महाराष्ट्रात फिरवलं असे मत त्यांनी मांडले समाजातील सत्यनिष्ठ बातम्या छापून समाजाचे मन परिवर्तन कराव हे प्रत्येक वृत्तपत्रांचं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येक पत्रकारांनी बाणेदारपणा स्वीकारावा असे मत त्यांनी मांडले.
प्रकाशन सोहळ्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. फुल्ल मानकर, प्रसिद्ध गझलकार प्रा सिद्धार्थ भगत, अंकुर साहित्य संघाच्या अध्यक्षा विद्याताई खडसे,पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, ग्रा वि का सोसायटीचे अध्यक्ष जानराव गिरी, जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोयर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रफुल चौहान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अरविंद वाढोणकर, शहराध्यक्ष प्रदीप ठुने, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे, खरेदी-विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, वकील संघाचे अध्यक्ष ॲड फिडेल बायदानी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शंकर वरघट, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटना अध्यक्ष ओकार चेके, राळेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा अशोक पिंपरे यांची उपस्थिती होती.
प्रकाशन सोहळ्या प्रसंगी राळेगाव बाजार समितीचे सभापती ऍड. प्रफुल्ल मानकर यांनी राळेगाव समाचार या साप्ताहिकाचे रूपांतर दैनिकात व्हावे अश्या शुभेच्छा देऊन शहरातील तीनही साप्ताहिकांच्या कार्याविषयी कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अंकुर साहित्य संघाच्या अध्यक्षा सौ. विद्याताई खडसे यांनी साहित्य आपल्याला जाण आणि भान शिकवतो म्हणून सुंदर विचार असेल तर माणूसही सदैव तरुण व सुंदर दिसतो. जग जिंकण्यासाठी प्रेम नावाचे दोन शब्द महत्वाचे आहे असे मत व्यक्त केले. त्यांनी दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी दिवाळी अंकातील उत्तम साहित्य व कविता यांचा आढावा घेतला.
या प्रसंगी प्रसिद्ध गझलकार प्रा. सिद्धार्थ भगत म्हणाले की राळेगाव समाचार चे साहित्य हे महाराष्ट्रभर वाचनीय असते ग्रामीण व आदिवासी बहुल क्षेत्रात काम करणाऱ्या राळेगाव समाचार चे सतत २९ वर्ष दिवाळी अंकाचे प्रकाशन बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. फिरोज लाखाणी सारखा एखादा ध्येयवेडा माणूसच हे धाडस करू शकते असे मत त्यांनी मांडले.
या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी साहित्य जगतात आपल्या धारदार व समाजाला दिशादर्शक ठरेल अश्या साहित्याने आपल्या नावाचा ठसा उमटविणारे प्रसिद्ध गझलकार प्रा. सिद्धार्थ भगत यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन प्रा. वसंत पुरके व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्याकरिता तालुक्यातील व शहरातील मान्यवर मंडळी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समीर लाखाणी, प्रसाद सेंगर, महेश परचाके, अनुप नागोसे, ओम कोसुळकार, साहिल लाखाणी सह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.
