यवतमाळ – देवजी निसर जैन धर्मस्थानक राजेंद्र नगर यवतमाळ येथे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी म. सा. यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि. 24 जुलै रोजी बोलतांना तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा. यांनी सद्रगुरुची माहिती विषद केली. मनवचन कायाने व्यवहारामध्ये, आचरणामध्ये एकरुप असणारे सद्गुरुच्या श्रेणी मध्ये येतात. सद्गुरु मनवचन कायाने सरळ असतात, तेच खरे मार्गदर्शक असतात, क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, अहंकार या पासून अलिप्त असतात अशा सद्गुरुंच्या प्रति समर्पण ठेवणारे आपल्या जिवनाचा उद्धार करु शकतात. अशा सद्गुरु श्रेणीमध्ये आचार्य सम्राट, गुरु भगवंत, प. पु. राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज येतात. समर्पण भावनेने सद्गुरुंच्या चरणी शरण आलेल्या अनेकांना जिवनाचे दर्शन समजावून सांगितले आहे, त्यांचे आध्यात्मिक जीवनामध्ये स्तर मध्ये वृद्धी केली आहे. त्यांनी पद प्रतिष्ठेकडे दुर्लक्ष करुन आध्यात्मिक वातावरणात जीवन जगण्याचा आनंद घेतला व समाजाचे उत्थान केले असे प्रभावी विचार तप महर्षी अक्षय ऋषीजी यांनी व्यक्त केले. जीवन का दर्शन गुरु का समर्पण या विषयावर ते बोलत होते. आनंद जन्मोत्सवा निमित्त संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामधून 1008 पेक्षा ही जास्त जैन बांधवांनी आयंबिलची तप आराधना केली असून 29 जुलै रोजी भाग्यवंत तपस्वी बांधवांना भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
