मुंबई प्रतिनिधी १५ मार्च : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यावरुन भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारविरोधात एकप्रकारे मोहीमच सुरु केली आहे. वाघ यांनी आज अहमदपूर तालुक्यातील किनगावात एका तरुणीसोबत झालेल्या अत्याचारावरुन राज्य सरकार आणि कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय. किनगावात मंदिराच्या वादातून एका तरुणीला काही जणांनी बेदम मारहाण करुन तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्याबाबत वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
Mpsc ची तयारी करणारी किनगाव अहमदपूरची तरूणी, गावातील भवानी मातेचं मंदिर पाडायला आलेल्या लोकांना मंदिर का पाडताय म्हणून तिनं विचारलं तर तिला घरात घूसून २ तास या लांडग्यांनी मारहाण केली. तिच्या सर्वांगावर चावे घेतले. तिच्या गुप्तांगात दगड टाकले. गळ्यावर कटर चालवायचा प्रयत्न केला. राज्यात झुंडशाही सुरू आहे का? असं ट्वीट करत वाघ यांनी सरकारला प्रश्न विचारलाय.
त्याचबरोबर ‘घरात घुसून मुलींना मारण्याची हिंमत होतेच कशी ?? अधिवेशनात महिला सुरक्षेवर सरकारचे भाषण ऐकून ४ च दिवस उलटले. बलात्काऱ्यांना अभय देण्याच्या सरकारच्या भुमिकेमुळेच हे हरामखोर माजलेत. ज्याची किंमत राज्यातील लेकीबाळींना मोजावी लागते. कुछ तो शर्म करो’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी अहमदनगरमधील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय

