जिल्हा प्रतिनिधी
गेल्या 24 तासात तीन पॉझिटिव्ह ; एक कोरोनामुक्त
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2163 बेड उपलब्ध
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण आठ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 669 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 666 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72882 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71087 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटीव्ह आलेल्यामध्ये घाटंजी व कळंब येथील प्रत्येकी एका महिला रूग्णाचा तसेच इतर शहरातील एका महिला रूग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 43 हजार 129 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 70 हजार 183 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.81 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.45 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2163 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2163 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
_______________________________________
ऊरी सर्जिकल स्ट्राईक नव्या पीढीसाठी नेहमीच प्रेरणादाई
शौर्य दिन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांचे प्रतिपादन
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : वीर सैनिक व त्यांच्या परिवाराच्या त्यागामुळेच आपण आपले-आपले काम शांततेने करत आहोत. जेवढा त्याग सैनिक देशासाठी करतात तेवढाच त्याग त्यांचा परिवार देखील करतो, त्यामुळे समाजाने त्यांचे ऋण कधीही विसरू नये, सैनिक आपल्या परिवाराचा व सामाजिक जिवनातील सुखाचा त्याग करत असल्यानेच सर्व देश सुरक्षीत आहे. भारतीय सैन्याच्या ऊरी सर्जिकल स्ट्राईक व इतर शौर्यगाथा नव्या पीढीला नेहमीच प्रेरणादाई ठरतील असे मत अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज शौर्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी श्री शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय सैन्याने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकीस्तानमध्ये ऊरी सर्जीकल स्ट्राईक करून दोनशे ते अडीचशे आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय सैन्याच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी दरवर्षी आजच्या दिवशी शौर्य दिन साजरा करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वऱ्हाडे यांनी सांगितले.भारतीय सैनिकांमध्ये असलेले धाडस ही देशासाठी मोठी उपलब्धता असून उरी सर्जीकल स्ट्राईक् युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विरनारी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, अलकनंदा पुजांजी सरोदे, सत्वशीला साहेबराव काळे, मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहीरे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार बालाजी शेंडगे यांनी केले.
कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक उपस्थित होते.
_______________________________________
मोठ्या प्रमाणात कर्जाचे अर्ज स्विकृत करून कर्ज-मेळावा यशस्वी करा
बँकर्स आढावा सभेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना
७ व १४ ऑक्टोबरला भव्य कर्ज मेळावा
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : जिल्ह्यात दिनांक 7 ऑक्टोबर व 14 ऑक्टोबरला सर्व बँकामार्फत मेगा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून याप्रसंगी सर्व बँकर व शासकीय यंत्रणेने आपसी समन्वयाद्वारे शेती, उद्योग व व्यावसायासाठी तसेच शासनाच्या विविध योजनेअंतर्गत कर्ज मिळण्याबाबत जास्तीत जास्त अर्ज प्राप्त करण्यासाठी आतापासून नियोजन करावे व मोठ्या प्रमाणात अर्ज स्विकृत करून कर्ज मेळावा यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बँकर्स आढावा सभेत दिल्या.
कर्ज मेळाव्या संबंधी सर्व बँकर्स व शासकीय योजना राबविणारे अधिकारी यांची आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल भवन येथे काल घेतली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभीये, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दीपक पेंदाम, सहाय्यक निबंधक राजेश गुर्जर इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
किसान क्रेडीट कार्ड, स्टँडअप इंडिया, पंतप्रधान स्वानिधी योजना, मुद्रा योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग योजना, आपत्कालीन पत हमी योजना, कृषी पायाभूत सुविधा योजना, अन्न प्रक्रीया उद्योग, मत्स व्यवसाय व विविध महामंडळा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्टापेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य होईल यादृष्टीने नियोजन करण्याबाबत तसेच यापुर्वी प्राप्त अर्जातील त्रुटींचे निराकरण करून त्यांना व विविध योजनेतून वंचित राहीलेल्या नागरिकांना प्राधाण्याने कर्ज मंजूर करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सर्व शासकीय योजनेअंतर्गत ज्या शाखेत कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहे, त्याचा निपटारा करून जास्तीत जास्त कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीला संबंधीत शासकीय यंत्रणेचे अधिकारी व सर्व बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
______________________________________
कंत्राटी वाहन चालकाची लेखी परीक्षा 3 ऑक्टोबरला
परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : जिल्हा सेतु सोसायटी मार्फत कंत्राटी वाहन चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत अभ्यंकर कन्या शाळा, आर्णी रोड, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे.
परीक्षेस पात्र उमेदवारांची बैठक क्रमांकासह यादी व सुचना जिल्ह्याच्या www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपल्या बैठक क्रमांकाची नोंद घ्यावी. परीक्षार्थ्यांनी परिक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास पुर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे तसेच परीक्षेस उपस्थित राहतांना सोबत ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स यापैकी कोणतेही एक मुळ ओळखपत्र व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावे. परीक्षेला उपस्थित राहतांना कोविड त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
_______________________________________
जिल्ह्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार
कोविड अनुषंगाने शासन निर्देशाचे परिपुर्ण पालन आवश्यक
– जिल्हाधिकारी अमोल येडगे
शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांना दोन्ही डोज बंधनकारक
शाळा स्वच्छ व निर्जंतूक करण्याच्या सूचना
पालकांनी दोन्ही डोज घेण्याचे आवाहन
यवतमाळ दि. 29 सप्टेंबर : ज्या गावात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही अशा ठिकाणी शासन निर्देशाप्रमाणे शाळा सुरू करण्यात याव्या, मात्र शाळा सुरू करतांना सर्व खाजगी व शासकीय शाळांनी कोविड अनुषंगाने शासन निर्देशाचे परिपुर्ण पालन करणे आवश्यक राहील अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करणेबाबत आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसुल भवन येथे आढावा सभा घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुडधे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, प्रशासन अधिकारी निता गावंडे, विस्तार अधिकारी डॉ. किशोरी जोशी, शिल्पा पोलपल्लीवार,उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वासुदेव डायरे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमीक) दीपक हाते, आरोग्य अधिकारी विजय अग्रवाल प्रामुख्याने हजर होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई, बसचालक यांचेसह 100 टक्के कर्मचाऱ्यांचे लसिकरण आवश्यक असल्याचे व ते वरिष्ठांकडून प्रमाणिक करून घेण्याचे, तसेच त्यांच्या कुटूंबाचे लसीकरण बंधनकारक राहील असे सांगितले. पालकांनी देखील दोन्ही डोज घेतल्यास कोरोनाचा प्रसार कमी होईल यास्तव पालकांना लसिकरणाचे दोन्ही डोज घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने करावे असे सांगितले. तसेच उद्यापासूनच सर्व शाळा स्वच्छ करून निर्जतुकीकरण करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. शाळा सुरू झाल्यावर एखाद्या गावात कोरोना पॉझेटिव्ह रूग्ण आढळल्यास तेथील शाळा पुढील सुचनेपर्यंत बंद करून तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसींग करावी व सर्वांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग दिनांक 4 ऑक्टोबर पासून सुरू करावयाचे आहेत. जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच वर्ग असणाऱ्या ग्रामीण भागात 521 शाळा असून शहरी भागत 257 अशा एकूण 778 शाळा आहेत. यात 3 लाख 15 हजार 173 विद्यार्थी व 8384 शिक्षक असल्याची माहिती विस्तार अधिकारी डॉ. किशोरी जोशी यांनी दिली.
बैठकीला शिक्षण विभागाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.



