भाजपा सरकारने देशभर दबंगशाही सुरु केली आहे. त्यांच्या बाजुने बोलणारे देशप्रेमी आणि विरोधात बोलणा-याला देशद्रोही ठरविल्या जात आहे. आता तर कृषी कायद्याच्या विरोधात शांततेत आंदोलन करणा-या शेतक-यांना चिरडण्यात आले. त्यामुळे केन्द्रात सत्तेत असणा-या नेत्यांनी आधी शेतक-यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि आता तर थेट शेतक-यांना चिरडणे सुरु केल्याची टिका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे. नुकतेच घडलेल्या उत्तरप्रदेश येथील लखीमपुर घटनेचा त्यांनी निषेध करीत आंदोलनाची घोषणा केली आहे.
केन्द्र सरकारने पारीत केलेले तिनही कृषी कायदे शेतकरी विरोधी आहे. या कायद्यांच्या विरोधात देशभर शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली येथे तर गेल्या एक वर्षापासून शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. केन्द्र सरकारने कुठलेही चर्चासत्र न घडविता कृषी कायदे पारीत केले. यामध्ये शेतक-यांचे मत सुध्दा जानून घेण्यात आले नाही. असे असतांनाही हे काळे कायदे परत घेण्यात आलेले नाही. त्यामुळेच देशभर सरकार विरोधात कृषी कायदे परत घेण्यासाठी आंदोलन सुरु आहे. उत्तरप्रदेश येथील लखीमपूर येथे सुध्दा शेतकरी शांततेच्या मार्गाने कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत होते. या दरम्यान भाजपा नेत्याच्या मुलाच्या कारने आंदोलन करणा-या शेतक-यांना चिरडले. याठिकाणी शेतक-यांवर गोळीबार सुध्दा करण्यात आला. हा सर्व प्रकार इंग्रजांच्या साम्राज्यशाही सारखाच असून देशात भाजपाच्या रुपात इंग्रज राज्य करीत असल्याची टिका सिकंदर शहा यांनी केली आहे. देशात प्रत्तेकाला आपला अधिकार मागण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. असे असतांनाही केन्द्रातील भाजपा सरकार शेतक-यांचे आंदोलन दडपशाहीने संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यानंतर कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना नजरकैदेत टाकून सरकारने अन्यायाचा कळस गाठला आहे. विशेष म्हणजे आता तर हरीयाना चे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी थेट शेतक-यांच्या विरोधात काठीचा वापर करण्याचे वक्तव्य केल्याने शेतक-यांमध्ये संताप आहे. या वक्तव्याचा सुध्दा सिकंदर शहा यांनी निषेध केला आहे. हे इंग्रज रुपी सरकार हद्दपार करण्याशिवाय आता पर्याय राहीला नसल्याचे सुध्दा त्यांनी म्हटले आहे.
अन्नत्याग आंदोलन
केन्द्रातील भाजपा सरकार तसेच त्यांचे नेते आता शेतक-यांचे आंदोलन हिंसक पध्दतीने चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. हा सर्व प्रकार सर्वसामान्य जनतेपर्यन्त जाणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरीकांचे लक्ष वेधण्याकरीता तसेच लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ यवतमाळात लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन बुधवार दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. प्रत्तेक गावात शेतक-यांनी सुध्दा लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करण्याचे आवाहन सिकंदर शहा यांनी केले आहे.



